मत्तय 18:10-35
मत्तय 18:10-35 MRCV
“या लहान बालकांपैकी एकालाही तुच्छ लेखू नका, कारण मी तुम्हाला सांगतो की स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या पित्याचे मुख निरंतर पाहत असतात. मानवपुत्र हरवलेले शोधावयास आणि उद्धार करावयास आला आहे. “तुम्हाला काय वाटते? एखाद्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यातील एक हरवले, तर तो मनुष्य काय करेल? तो आपली नव्याण्णव मेंढरे डोंगरावर सोडून ते हरवलेले मेंढरू शोधण्यास जाणार नाही काय? आणि मी तुम्हाला खचित सांगतो, ते सापडल्यावर, आपली नव्याण्णव मेंढरे सुखरुप आहेत त्यापेक्षा, आपले हरवलेले मेंढरू सापडले म्हणून तो अधिक आनंद करेल. त्याच प्रकारे या लहान बालकातील एकाचाही नाश होऊ नये अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे. “तुझ्या भावाने किंवा बहिणीने पाप केले असेल, तर त्याची चूक त्याला समजावून सांग, परंतु हे तुमच्या दोघांमध्ये असू दे. त्यांनी तुझे ऐकले, तर तू त्यांना परत मिळविले आहेस. जर त्यांनी ऐकले नाही तर, एक किंवा दोन साक्षीदारांना बरोबर घेऊन जा, म्हणजे ‘दोन किंवा तीन साक्षीदारांच्या संमतीने प्रकरण स्थापित होईल.’ यावरही ते तुझे ऐकण्यास तयार झाले नाही, तर तुझा दावा मंडळीकडे घेऊन जा आणि मंडळीचेही ऐकण्याचे त्यांनी नाकारले, तर तो एखादा गैरयहूदी किंवा जकातदार आहे असे समजून तू त्याच्याशी वाग. “मी तुम्हाला खरोखर सांगतो, पृथ्वीवर जे काही तुम्ही बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तुम्ही मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. “मी तुम्हाला पुन्हा निश्चितपणे सांगतो की, या पृथ्वीवर तुम्हापैकी दोघे एकचित्त होऊन कोणतीही मागणी करतील, तर माझा स्वर्गीय पिता तुमची ती मागणी मान्य करेल. कारण जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतात, तिथे मी उपस्थित आहे.” मग पेत्र येशूंकडे आला आणि त्याने त्यांना विचारले, “प्रभूजी, माझ्या भावाने अथवा बहिणीने माझ्याविरुद्ध पाप केले, तर मी त्यांना किती वेळा क्षमा करावी? सात वेळेस का?” येशूंनी उत्तर दिले, “सात नाही तर साताच्या सत्तर वेळा! “म्हणून स्वर्गाचे राज्य त्या राजासारखे आहे, ज्याला आपल्या नोकरांकडून हिशोब घ्यायचा होता. हिशोब घेत असताना, ज्या नोकरावर राजाचे दहा हजार तालांतचे कर्ज होते, त्याला राजापुढे आणण्यात आले. त्या नोकराला हे कर्ज फेडणे अशक्य होते, म्हणून प्रभूने कर्जदार, त्याची पत्नी, त्याची मुले, आणि त्याचे जे सगळे होते ते विकून कर्ज वसूल करण्याची आज्ञा दिली. “तेव्हा तो नोकर गुडघे टेकून खाली पडला आणि गयावया करून राजाला म्हणाला, ‘महाराज, थोडा धीर धरा. मी आपले सर्व कर्ज फेडीन.’ तेव्हा प्रभूला त्या नोकराची दया आली, त्याचे सर्व कर्ज माफ केले आणि त्याला सोडून दिले. “पण तो नोकर बाहेर गेला आणि ज्याच्याकडे त्याचे शंभर दिनारचे कर्ज होते तो सोबतीचा नोकर त्याला भेटला, त्याने त्याची मानगुट पकडली आणि ताबडतोब आपले कर्ज देण्याची त्याने मागणी केली. “त्याचा कर्जदार त्याच्यापुढे पालथा पडला व विनंती करू लागला, ‘थोडा धीर धरा, मी सर्व कर्ज फेडीन.’ “पण तो थांबावयास तयार नव्हता. त्याने त्या मनुष्याला अटक करवून तो पैसे फेडेपर्यंत तुरुंगात डांबून ठेवले. जेव्हा इतर नोकरांनी हे पाहिले, तेव्हा ते क्रोधाने भरून प्रभूकडे गेले आणि काय घडले हे सर्व त्यांनी राजाला सांगितले.” तेव्हा प्रभूने ज्या नोकराला क्षमा केली होती, त्या नोकराला बोलाविले. राजा त्याला म्हणाला, “अरे दुष्ट माणसा, मी तुझे सर्व कर्ज माफ केले, कारण तू मला तशी विनंती केलीस; ज्याप्रमाणे मी तुझ्यावर दया केली त्याप्रमाणे तू त्याच्यावर दया करू नये काय? मग संतप्त झालेल्या प्रभूने त्या दुष्ट मनुष्याला, तो सर्व कर्ज फेडीपर्यंत तुरुंगामध्ये कोंडून ठेवले. “जर तुम्ही तुमच्या भावाची व बहिणीची मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गीय पिताही याचप्रकारे तुम्हा प्रत्येकाला वागवेल.”

