मत्तय 12:22-45
मत्तय 12:22-45 MRCV
नंतर त्यांनी एका भूतग्रस्त मनुष्याला येशूंकडे आणले, जो आंधळा व मुका होता, आणि येशूंनी त्याला बरे केले, व त्याला बोलता व पाहता येऊ लागले. तेव्हा सर्व लोक आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हाच दावीदाचा पुत्र असेल काय?” परंतु हे ऐकल्यावर परूशी लोक म्हणाले, “हा मनुष्य केवळ बालजबूल, जो भुतांचा राजा सैतान, याच्या साहाय्याने भुते घालवितो.” त्यांचे विचार येशूंना माहीत होते, आणि ते त्यांना म्हणाले, “प्रत्येक फूट पडलेल्या राज्याचा नाश होतो किंवा एखाद्या शहरातील किंवा घरातील लोकांत आपसात फूट पडली, तर ते शहर किंवा ते घर टिकू शकत नाही. जर सैतानच सैतानाला घालवू लागला आणि त्याच्यात फूट पडली, तर त्याचे राज्य कसे टिकेल? आणि जर मी बालजबूलाच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? तर मग, ते तुमचे न्यायाधीश असतील. परंतु, मी जर परमेश्वराच्या आत्म्याने भुते काढतो, तर परमेश्वराचे राज्य तुमच्यावर आले आहे. “किंवा मग, बळकट माणसाच्या घरात प्रवेश करून त्याला आधी बांधल्याशिवाय त्याची मालमत्ता लुटून नेणे कसे शक्य होईल? त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. “जो माझ्याबरोबर नाही तो माझ्याविरुद्ध आहे, आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखुरतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक प्रकारचे पाप किंवा निंदा यांची क्षमा होऊ शकेल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध केलेल्या निंदेची क्षमा होणार नाही. जो कोणी मानवपुत्राच्या विरुद्ध बोलेल त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करेल, त्याला या युगात आणि येणार्या युगात कधीही क्षमा होणार नाही. “जर झाड चांगले असेल तर त्याचे फळ देखील चांगले असते आणि जर झाड चांगले नसेल तर त्याचे फळ देखील चांगले नसते. झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते. अहो सापांच्या पिलांनो! तुमच्यासारख्या दुष्टांना चांगले आणि यथायोग्य कसे बोलता येईल? कारण अंतःकरणात जे भरलेले आहे तेच मुखातून बाहेर पडते. चांगला मनुष्य आपल्यात साठविलेल्या चांगल्या गोष्टी बाहेर काढतो, तर दुष्ट मनुष्य वाईटाने भरलेल्या साठ्यातून वाईटच बाहेर काढतो. मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक निरर्थक शब्दाबद्दल जाब द्यावा लागणार आहे. कारण तुमच्या शब्दांवरूनच तुम्ही निर्दोष ठराल, किंवा तुमच्या शब्दांवरूनच तुम्ही दोषी ठराल.” मग परूशी व नियमशास्त्र शिक्षक यांच्यापैकी काही येशूंना म्हणाले, “गुरुजी, तुमच्याकडून आम्हास चिन्ह पाहायचे आहे.” येशू त्यांना म्हणाले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते! परंतु योनाह संदेष्ट्याच्या चिन्हाखेरीज दुसरे कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही. कारण ज्याप्रमाणे योनाह मोठ्या माशाच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहिला, तसेच मानवपुत्र, भूमीच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहील. न्यायाच्या दिवशी निनवेहचे लोक उठून या पिढीला दोषी ठरवतील, कारण योनाहचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चात्ताप केला; आणि पाहा, योनाहपेक्षाही श्रेष्ठ असा एकजण येथे आहे. दक्षिणेची राणी न्यायकाळी या पिढीबरोबर उठेल आणि त्यांना दंडपात्र ठरवेल, कारण ती शलोमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या टोकाकडून आली; आणि पाहा, आता तर शलोमोनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे. “एखाद्या मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला, म्हणजे तो रुक्ष ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी जागा शोधतो, आणि ती त्याला सापडत नाही, त्यावेळी तो म्हणतो, ‘जे घर मी सोडले, तिथे परत जाईन.’ तो परत आला म्हणजे त्याला ते घर रिकामे, झाडून स्वच्छ केलेले व व्यवस्थित ठेवलेले असे आढळते. नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा अधिक दुष्ट असे आणखी सात दुरात्मे आपल्याबरोबर घेऊन येतो व ते आत जाऊन तिथे राहतात, आणि मग त्या मनुष्याची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच या दुष्ट पिढीचे होईल.”

