मत्तय 12:22-45
मत्तय 12:22-45 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग काही मनुष्यांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या मनुष्यास बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला. सर्व लोक चकित झाले, ते म्हणाले, “हा दाविदाचा पुत्र असेल काय?” परूश्यांनी लोकांस हे बोलताना ऐकले. परूशी म्हणाले, “भूते काढण्यासाठी येशू बालजबूलचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भूतांचा अधिपती आहे.” परूशी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, “आपसात लढणारी राज्ये नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही. आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल? आणि मी जर बालजबूलाच्या सहाय्याने भूते काढतो तर तुमचे लोक कोणाच्या सामर्थ्याने भूते काढतात. म्हणून तुमचे स्वतःचे लोक तुमचा न्याय करतील. परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. किंवा एखाद्या बलवान मनुष्याच्या घरात शिरून, त्याच्या घरातील सर्व वस्तूची चोरी जर कोणाला करायची असेल तर प्रथम त्या बलवान मनुष्यास तो बांधून टाकील व मग तो चोरी करील. जो मनुष्य माझ्याबरोबर काम करीत नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकतो. म्हणून मी तुम्हास सांगतो, मनुष्यांना ते करीत असलेल्या सर्व पापांची व वाईट बोलतील त्याबद्दलही क्षमा करण्यात येईल पण जर कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल, तर त्यास क्षमा करण्यात येणार नाही. एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्यास क्षमा करण्यात येईल पण जो कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल त्यास क्षमा होणार नाही. त्यास या युगातही क्षमा होणार नाही व येणाऱ्या युगातही होणार नाही. झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा; कारण झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते. अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हास चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? जे अंतःकरणात आहे तेच तोंडावाटे बाहेर पडते. चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट मनुष्य आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. आणखी मी तुम्हास सांगतो की. जो प्रत्येक व्यर्थ शब्द लोक बोलतील त्याचा हिशोब ते न्यायाच्या दिवशी देतील. कारण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरूनच दोषी ठरशील.” काही नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांच्यापैकी काहीजणांनी येशूला म्हटले, “गुरुजी, तुमच्या हातून एखादे चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे.” येशूने उत्तर दिले, “जे लोक देवाशी अप्रामाणिक आहेत, पापी आहेत असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात. पण योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह तुम्हास मिळणार नाही. कारण योना जसा तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. जेव्हा तुमच्या पिढीचा न्याय होईल, तेव्हा निनवे शहराचे लोक उभे राहतील, तुमच्याविरुध्द साक्ष देतील आणि तुम्हास दोष देतील कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि आता तर तुमच्यामध्ये योनापेक्षा महान असा कोणीएक येथे आहे. न्यायाच्या दिवशी दक्षिणेकडील देशाची राणी या पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवील कारण शलमोनाचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या शेवटापासून आली आणि शलमोनापेक्षा महान असा कोणी येथे आहे.” “जेव्हा अशुद्ध आत्मा मनुष्यास सोडून बाहेर निघून जातो तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणाहून विसावा शोधीत फिरतो पण तो त्यास मिळत नाही. तेव्हा तो म्हणतो, जेथून मी आलो त्या माझ्या घरात मी परत जाईन आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा ते घर रिकामे असलेले तसेच स्वच्छ व नीटनेटके असे त्यास दिसते. नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा दुष्ट असे दुसरे सात आणखी आत्मे आपल्याबरोबर घेतो व ते आत शिरून त्यास झपाटतात व त्याच्यात राहतात. मग त्या मनुष्याची शेवटची स्थिति पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच आजच्या या पापी पिढीचे होईल.”
मत्तय 12:22-45 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर त्यांनी एका भूतग्रस्त मनुष्याला येशूंकडे आणले, जो आंधळा व मुका होता, आणि येशूंनी त्याला बरे केले, व त्याला बोलता व पाहता येऊ लागले. तेव्हा सर्व लोक आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हाच दावीदाचा पुत्र असेल काय?” परंतु हे ऐकल्यावर परूशी लोक म्हणाले, “हा मनुष्य केवळ बालजबूल, जो भुतांचा राजा सैतान, याच्या साहाय्याने भुते घालवितो.” त्यांचे विचार येशूंना माहीत होते, आणि ते त्यांना म्हणाले, “प्रत्येक फूट पडलेल्या राज्याचा नाश होतो किंवा एखाद्या शहरातील किंवा घरातील लोकांत आपसात फूट पडली, तर ते शहर किंवा ते घर टिकू शकत नाही. जर सैतानच सैतानाला घालवू लागला आणि त्याच्यात फूट पडली, तर त्याचे राज्य कसे टिकेल? आणि जर मी बालजबूलाच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? तर मग, ते तुमचे न्यायाधीश असतील. परंतु, मी जर परमेश्वराच्या आत्म्याने भुते काढतो, तर परमेश्वराचे राज्य तुमच्यावर आले आहे. “किंवा मग, बळकट माणसाच्या घरात प्रवेश करून त्याला आधी बांधल्याशिवाय त्याची मालमत्ता लुटून नेणे कसे शक्य होईल? त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. “जो माझ्याबरोबर नाही तो माझ्याविरुद्ध आहे, आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखुरतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक प्रकारचे पाप किंवा निंदा यांची क्षमा होऊ शकेल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध केलेल्या निंदेची क्षमा होणार नाही. जो कोणी मानवपुत्राच्या विरुद्ध बोलेल त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करेल, त्याला या युगात आणि येणार्या युगात कधीही क्षमा होणार नाही. “जर झाड चांगले असेल तर त्याचे फळ देखील चांगले असते आणि जर झाड चांगले नसेल तर त्याचे फळ देखील चांगले नसते. झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते. अहो सापांच्या पिलांनो! तुमच्यासारख्या दुष्टांना चांगले आणि यथायोग्य कसे बोलता येईल? कारण अंतःकरणात जे भरलेले आहे तेच मुखातून बाहेर पडते. चांगला मनुष्य आपल्यात साठविलेल्या चांगल्या गोष्टी बाहेर काढतो, तर दुष्ट मनुष्य वाईटाने भरलेल्या साठ्यातून वाईटच बाहेर काढतो. मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक निरर्थक शब्दाबद्दल जाब द्यावा लागणार आहे. कारण तुमच्या शब्दांवरूनच तुम्ही निर्दोष ठराल, किंवा तुमच्या शब्दांवरूनच तुम्ही दोषी ठराल.” मग परूशी व नियमशास्त्र शिक्षक यांच्यापैकी काही येशूंना म्हणाले, “गुरुजी, तुमच्याकडून आम्हास चिन्ह पाहायचे आहे.” येशू त्यांना म्हणाले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते! परंतु योनाह संदेष्ट्याच्या चिन्हाखेरीज दुसरे कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही. कारण ज्याप्रमाणे योनाह मोठ्या माशाच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहिला, तसेच मानवपुत्र, भूमीच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहील. न्यायाच्या दिवशी निनवेहचे लोक उठून या पिढीला दोषी ठरवतील, कारण योनाहचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चात्ताप केला; आणि पाहा, योनाहपेक्षाही श्रेष्ठ असा एकजण येथे आहे. दक्षिणेची राणी न्यायकाळी या पिढीबरोबर उठेल आणि त्यांना दंडपात्र ठरवेल, कारण ती शलोमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या टोकाकडून आली; आणि पाहा, आता तर शलोमोनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे. “एखाद्या मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला, म्हणजे तो रुक्ष ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी जागा शोधतो, आणि ती त्याला सापडत नाही, त्यावेळी तो म्हणतो, ‘जे घर मी सोडले, तिथे परत जाईन.’ तो परत आला म्हणजे त्याला ते घर रिकामे, झाडून स्वच्छ केलेले व व्यवस्थित ठेवलेले असे आढळते. नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा अधिक दुष्ट असे आणखी सात दुरात्मे आपल्याबरोबर घेऊन येतो व ते आत जाऊन तिथे राहतात, आणि मग त्या मनुष्याची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच या दुष्ट पिढीचे होईल.”
मत्तय 12:22-45 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले; आणि त्याने त्याला बरे केले, तेव्हा तो मुका बोलू व पाहू लागला. तेव्हा सर्व लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हा दाविदाचा पुत्र असेल काय?” परंतु परूशी हे ऐकून म्हणाले, “भुतांचा अधिपती जो बाल्जबूल त्याच्या साहाय्याशिवाय हा भुते काढत नाही.” येशूने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, “आपसांत फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसांत फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही. सैतान जर सैतानाला काढत असेल तर त्याच्यात फूट पडली आहे; मग त्याचे राज्य कसे टिकणार? आणि मी जर बाल्जबूलच्या साहाय्याने भुते काढत असेन तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील. परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भुते काढत आहे तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. अथवा बलवान माणसाला अगोदर बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची चीजवस्तू कोणाला लुटून नेता येईल काय? त्याला बांधले तरच तो त्याचे घर लुटील. जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकतो. ह्यास्तव मी तुम्हांला सांगतो की, प्रत्येक पाप व दुर्भाषण ह्यांची माणसांना क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही. मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही; ह्या युगात नाही व येणार्या युगातही नाही. ‘झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले’ असे म्हणा; अथवा ‘झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट’ असे म्हणा; कारण फळावरून झाड कळते. अहो सापाच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. चांगला माणूस आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. मी तुम्हांला सांगतो की, माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील.” तेव्हा शास्त्री व परूशी ह्यांच्यापैकी काही जण त्याला म्हणाले, “गुरूजी, तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे.” त्याने त्यांना उत्तर दिले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा ह्याच्या चिन्हावाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा ‘योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता’ तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला; आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरवील; कारण ती शलमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली; आणि पाहा, शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जल स्थळी फिरत राहतो, परंतु तो त्याला मिळत नाही. मग तो म्हणतो, ‘ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन;’ आणि तेथे गेल्यावर ते त्याला रिकामे असलेले, झाडलेले व सुशोभित केलेले असे आढळते. नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे सात आत्मे आपणाबरोबर घेऊन येतो आणि ते आत जाऊन तेथे राहतात; मग त्या माणसाची शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते; तसेच ह्या दुष्ट पिढीचेही होईल.
मत्तय 12:22-45 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
एकदा आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला येशूकडे आणण्यात आले. येशूने त्याला बरे केले आणि तो पाहू व बोलू लागला. तेव्हा सर्व लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाला, “हा दावीदचा पुत्र असेल काय?” परंतु परुशी हे ऐकून म्हणाले, “भुतांचा अधिपती बालजबूल त्याला साहाय्य करतो म्हणून भुते काढणे त्याला शक्य होते.” त्याने त्यांच्या मनातील विचार ओळखून त्यांना म्हटले, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा कुटुंब टिकत नाही. सैतान सैतानाशीच लढत असेल तर त्याच्या राज्यात फूट पडली आहे. मग त्याचे राज्य कसे टिकणार? मी जर बालजबूलच्या साहाय्याने भुते काढत असेन, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? तर मग तुम्ही चुकत आहात, हे तेच तुम्हांला दाखवून देतील! मात्र मी देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भुते काढत आहे, त्याअर्थी देवाचे राज्य तुमच्यासाठी आले आहे. किंवा बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता कुणालाही लुटता येणार नाही. त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. जो माझ्या बाजूचा नाही, तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही, तो उधळून टाकतो. म्हणून मी तुम्हांला सांगतो, प्रत्येक पाप व दुर्भाषण ह्यांबद्दल माणसांना क्षमा मिळेल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे, त्याबद्दल क्षमा मिळणार नाही. मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल, तर त्याबद्दल त्याला क्षमा मिळेल. परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल, त्याबद्दल त्याला आताच्या किंवा येणाऱ्या युगातही क्षमा मिळणार नाही. झाड चांगले तर त्याचे फळ चांगले, झाड वाईट तर त्याचे फळ वाईट, असे म्हणतात; कारण झाड फळावरून ओळखले जाते. अहो सापांच्या पिल्लांनो, तुम्ही दुष्ट असता, तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? अंतःकरणात जे भरून उरले आहे तेच मुखावाटे निघणार. चांगला माणूस त्याच्या चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो आणि वाईट मनुष्य त्याच्या वाईट भांडारातून वाईट ते काढतो. मी तुम्हांला सांगतो, प्रत्येक निरर्थक शब्दाचा हिशोब न्यायाच्या दिवशी सर्वांना द्यावा लागेल; कारण तुझ्या शब्दांवरून तुला दोषी किंवा निर्दोष घोषित केले जाईल.” तेव्हा शास्त्री व परुशी ह्यांच्यापैकी काही जण येशूला म्हणाले, “गुरुवर्य, तुमच्याकडून चिन्ह पाहावे, अशी आमची इच्छा आहे.” येशूने त्यांना उत्तर दिले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते. परंतु योना संदेष्ट्याच्या चिन्हाशिवाय तुम्हांला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. निनवेचे लोक ह्या पिढीबरोबर न्यायकाळी उठून तुम्हांला दोषी ठरवतील; कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे. दक्षिणेची राणी न्यायाच्या दिवशी ह्या पिढीबरोबर उठून तुम्हांला दोषी ठरवील; कारण ती शलमोनचे ज्ञान ऐकायला तिच्या देशातून आली आणि पाहा, शलमोनपेक्षा थोर असा कोणी येथे आहे. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जल स्थळी फिरत राहतो. परंतु तशी जागा त्याला मिळाली नाही तर तो म्हणतो, “ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन’ आणि तेथे गेल्यावर ते त्याला रिकामे, स्वच्छ व व्यवस्थित असे आढळते. नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा दुष्ट असे दुसरे सात आत्मे आपल्याबरोबर घेऊन येतो आणि ते आत जाऊन तेथे वस्ती करतात. अर्थात, त्या माणसाची दशा पूर्वीपेक्षा अधिक वाईट होते. तसेच ह्या दुष्ट पिढीचेही होईल.”