YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 25:14-46

मत्तय 25:14-46 MACLBSI

स्वर्गाचे राज्य असे असेल: परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने त्याच्या दासांना बोलावून त्यांच्याकडे त्याची मालमत्ता सोपवून दिली. एकाला त्याने पाच हजार सुवर्ण मोहरा, दुसऱ्याला दोन हजार मोहरा तर तिसऱ्याला एक हजार मोहरा अशा ज्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे दिल्या आणि तो परदेशी गेला. ज्याला पाच हजार मोहरा मिळाल्या होत्या त्याने लगेच जाऊन त्यांच्यावर व्यापार केला व आणखी पाच हजार कमावल्या. तसेच ज्याला दोन हजार मिळाल्या होत्या त्यानेही आणखी दोन हजार मिळवल्या, परंतु ज्याला एक हजार मिळाल्या होत्या त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात त्याच्या धन्याचा पैसा लपवून ठेवला. बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी परत आला व त्यांच्याकडून हिशोब घेऊ लागला. ज्याला पाच हजार मोहरा मिळाल्या होत्या तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, “महाराज, आपण माझ्याकडे पाच हजार मोहरा सोपवून दिल्या होत्या, पाहा, त्यांच्यावर मी आणखी पाच हजार मिळवल्या आहेत.’ त्याला त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोड्या गोष्टींत विश्वासू राहिलास. मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. तू तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’ त्यानंतर ज्याला दोन हजार मिळाल्या होत्या तोही येऊन म्हणाला, “महाराज, आपण माझ्याकडे दोन हजार मोहरा सोपवून दिल्या होत्या, पाहा, त्यांच्यावर मी आणखी दोन हजार मिळविल्या आहेत.’ त्यालाही त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोड्या गोष्टींत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’ ज्याला एक हजार मोहरा मिळाल्या होत्या तोही येऊन म्हणाला, “महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर आहात. जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता. म्हणून मी भ्यालो व जाऊन तुमच्या हजार मोहरा मी जमिनीत लपवून ठेवल्या होत्या. जे तुमचे आहे ते तुम्हांला परत करत आहे.’ त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, “अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापणी करतो व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो, हे तुला ठाऊक होते ना? तर मग माझे पैसे सावकाराकडे ठेवायचे होते म्हणजे मी आल्यावर ते मला व्याजासकट परत मिळाले असते.’ तो त्याच्या दासांना म्हणाला, “त्या हजार मोहरा त्याच्याकडून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल आणि ज्या कोणाकडे नाही त्याच्याजवळ जे असेल तेदेखील त्याच्याकडून काढून घेतले जाईल आणि हे बघा, ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका. तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.’ जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल तेव्हा तो स्वतःच्या राजासनावर बसेल. त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि मेंढपाळ जसे शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळी करील. नीतिमान लोकांना तो त्याच्या उजवीकडे व इतरांना डावीकडे ठेवील. मग राजा त्याच्या उजवीकडच्यांना म्हणेल, “अहो, माझ्या पित्याचा आशीर्वाद लाभलेल्या लोकांनो, या. जे राज्य जगाच्या निर्मितीपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे, ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला खायला दिले; तान्हेला होतो, तेव्हा मला प्यायला दिले; परका होतो, तेव्हा मला घरात घेतले; उघडा होतो, तेव्हा मला वस्त्र दिले; आजारी होतो, तेव्हा माझी काळजी घेतली; तुरुंगात होतो, तेव्हा तुम्ही मला भेटायला आलात.’ त्या वेळी नीतिमान त्याला विचारतील, “प्रभो, आम्ही कधी तुम्हांला खायला दिले? केव्हा तुम्हांला प्यायला दिले? केव्हा तुम्हांला परके पाहून घरात घेतले? आणि केव्हा तुम्हांला उघडे पाहून वस्त्र दिले? तुमच्या कोणत्या आजारपणात आम्ही काळजी घेतली? आणि कोणत्या तुरुंगात आम्ही तुम्हांला भेटायला आलो?’ राजा त्यांना उत्तर देईल, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ज्याअर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकासाठी केले, त्याअर्थी ते माझ्यासाठी केले.’ त्यानंतर डावीकडच्यांनाही तो म्हणेल, “अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघून सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो अनंत अग्नी सिद्ध केला आहे, त्यात जा. कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही. तान्हेला होतो, तेव्हा मला प्यायला दिले नाही. परका होतो, तेव्हा मला घरात घेतले नाही; उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही; आजारी व तुरुंगात होतो, तेव्हा माझ्या भेटीला आला नाही.’ त्या वेळेस तेदेखील त्याला विचारतील, “प्रभो, आम्ही केव्हा तुम्हांला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी, किंवा तुरुंगात पाहिले आणि तुम्हांला साहाय्य केले नाही?’ तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, “मी तुम्हांला खरोखर सांगतो, ज्याअर्थी ह्या कनिष्ठांपैकी एकाला साहाय्य करायचे तुम्ही नाकारले, त्याअर्थी तुम्ही मला साहाय्य करायचे नाकारले.’ तर मग ह्यांना अनंत शिक्षा भोगायला पाठवले जाईल आणि नीतिमान शाश्वत जीवन उपभोगायला जातील.”