मत्तय 12:22-45
मत्तय 12:22-45 MACLBSI
एकदा आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला येशूकडे आणण्यात आले. येशूने त्याला बरे केले आणि तो पाहू व बोलू लागला. तेव्हा सर्व लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाला, “हा दावीदचा पुत्र असेल काय?” परंतु परुशी हे ऐकून म्हणाले, “भुतांचा अधिपती बालजबूल त्याला साहाय्य करतो म्हणून भुते काढणे त्याला शक्य होते.” त्याने त्यांच्या मनातील विचार ओळखून त्यांना म्हटले, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा कुटुंब टिकत नाही. सैतान सैतानाशीच लढत असेल तर त्याच्या राज्यात फूट पडली आहे. मग त्याचे राज्य कसे टिकणार? मी जर बालजबूलच्या साहाय्याने भुते काढत असेन, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? तर मग तुम्ही चुकत आहात, हे तेच तुम्हांला दाखवून देतील! मात्र मी देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भुते काढत आहे, त्याअर्थी देवाचे राज्य तुमच्यासाठी आले आहे. किंवा बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता कुणालाही लुटता येणार नाही. त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. जो माझ्या बाजूचा नाही, तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही, तो उधळून टाकतो. म्हणून मी तुम्हांला सांगतो, प्रत्येक पाप व दुर्भाषण ह्यांबद्दल माणसांना क्षमा मिळेल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे, त्याबद्दल क्षमा मिळणार नाही. मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल, तर त्याबद्दल त्याला क्षमा मिळेल. परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल, त्याबद्दल त्याला आताच्या किंवा येणाऱ्या युगातही क्षमा मिळणार नाही. झाड चांगले तर त्याचे फळ चांगले, झाड वाईट तर त्याचे फळ वाईट, असे म्हणतात; कारण झाड फळावरून ओळखले जाते. अहो सापांच्या पिल्लांनो, तुम्ही दुष्ट असता, तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? अंतःकरणात जे भरून उरले आहे तेच मुखावाटे निघणार. चांगला माणूस त्याच्या चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो आणि वाईट मनुष्य त्याच्या वाईट भांडारातून वाईट ते काढतो. मी तुम्हांला सांगतो, प्रत्येक निरर्थक शब्दाचा हिशोब न्यायाच्या दिवशी सर्वांना द्यावा लागेल; कारण तुझ्या शब्दांवरून तुला दोषी किंवा निर्दोष घोषित केले जाईल.” तेव्हा शास्त्री व परुशी ह्यांच्यापैकी काही जण येशूला म्हणाले, “गुरुवर्य, तुमच्याकडून चिन्ह पाहावे, अशी आमची इच्छा आहे.” येशूने त्यांना उत्तर दिले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते. परंतु योना संदेष्ट्याच्या चिन्हाशिवाय तुम्हांला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. निनवेचे लोक ह्या पिढीबरोबर न्यायकाळी उठून तुम्हांला दोषी ठरवतील; कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे. दक्षिणेची राणी न्यायाच्या दिवशी ह्या पिढीबरोबर उठून तुम्हांला दोषी ठरवील; कारण ती शलमोनचे ज्ञान ऐकायला तिच्या देशातून आली आणि पाहा, शलमोनपेक्षा थोर असा कोणी येथे आहे. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जल स्थळी फिरत राहतो. परंतु तशी जागा त्याला मिळाली नाही तर तो म्हणतो, “ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन’ आणि तेथे गेल्यावर ते त्याला रिकामे, स्वच्छ व व्यवस्थित असे आढळते. नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा दुष्ट असे दुसरे सात आत्मे आपल्याबरोबर घेऊन येतो आणि ते आत जाऊन तेथे वस्ती करतात. अर्थात, त्या माणसाची दशा पूर्वीपेक्षा अधिक वाईट होते. तसेच ह्या दुष्ट पिढीचेही होईल.”

