YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 26:13-28

नीतिसूत्रे 26:13-28 MARVBSI

आळशी म्हणतो, “रस्त्यावर सिंह आहे, चवाठ्यावर सिंह आहे.” दरवाजा आपल्या बिजागर्‍यांवर फिरतो, तसा आळशी आपल्या अंथरुणावर लोळतो. आळशी आपला हात ताटात घालतो, तो परत तोंडाकडे नेण्यास त्याला श्रम वाटतात. योग्य उत्तर देणार्‍या सात जणांपेक्षा आळशी आपणाला शहाणा समजतो. दुसर्‍याच्या तंट्यात पडून संतप्त होणारा, सहज जवळून जाणार्‍या कुत्र्याचे कान धरून ओढणार्‍यासारखा होय. जो आपल्या शेजार्‍याला फसवतो आणि म्हणतो की, “मी थट्टा नव्हतो का करीत?” तो कोलिते, बाण व मारक शस्त्रे फेकणार्‍या वेड्यासारखा आहे. सरपण नसल्यामुळे विस्तव विझतो; कानाशी लागणारा कोणी नसला म्हणजे तंटा मिटतो. निखार्‍याला जसे कोळसे, विस्तवाला जसे सरपण, तसा भांडण पेटवायला भांडखोर लागतो. कानी लागणार्‍याचे शब्द रुचकर पक्‍वान्नासारखे असतात, ते पोटात अगदी खोल शिरतात. वाणी कळवळ्याची पण मन दुष्ट असणे हे, रुप्याचा मुलामा दिलेल्या मडक्यासारखे होय. द्वेष्टा आपल्या वाणीने खोटा बहाणा करतो, पण अंतर्यामी कपट बाळगतो; तो गोडगोड बोलतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस, कारण त्याच्या हृदयात सात विषे आहेत; त्याचा द्वेष धूर्ततेने झाकला आहे, तरी समाजापुढे त्याची दुष्टता उघडकीस येईल. जो खाच खणतो तो तिच्यात पडेल, जो धोंडा लोटतो त्याच्यावर तो उलट येईल. लबाड जिव्हा आपण घायाळ केलेल्यांचा द्वेष करते, खुशामत करणारे तोंड नाशाला कारण होते.