मग तो तेथून निघून यहूदीया प्रांतात व यार्देनेच्या पलीकडे गेला; तेव्हा पुन्हा लोक घोळक्यांनी त्याच्याकडे आले; आणि पुन्हा तो आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांना शिकवू लागला.
परूशी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले की, “पुरुषाने बायको टाकणे सशास्त्र आहे काय?”
उत्तरादाखल तो म्हणाला, “मोशेने तुम्हांला काय आज्ञा दिली आहे?”
ते म्हणाले, “सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे.”
येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या अंत:करणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली;
परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून ‘देवाने त्यांना स्त्रीपुरुष असे उत्पन्न केले.’
‘ह्या कारणामुळे ‘पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील; आणि ती दोघे एकदेह होतील.’
ती पुढे दोन नव्हत तर एकदेह आहेत.
म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये.”
नंतर घरात त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले.
तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जो कोणी आपल्या बायकोला टाकतो व दुसरे लग्न करतो तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो;
आणि जर तिने आपल्या नवर्याला सोडले व दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते.”
मग त्याने बालकांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणार्यांना दटावले.
ते पाहून येशूला फार वाईट वाटले; आणि तो त्यांना म्हणाला, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.
मी तुम्हांला खचीत सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही.”
तेव्हा त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.
मग तो निघून वाटेस लागणार तोच एकाने धावत येऊन व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विचारले, “उत्तम गुरूजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे?”
येशू त्याला म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव त्याच्यावाचून कोणी उत्तम नाही.
तुला आज्ञा ठाऊकच आहेत; ‘खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, ठकवू नकोस, आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख.”’
त्याने त्याला उत्तर दिले, “गुरूजी, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे.”
येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, “तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे; जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल, [वधस्तंभ घेऊन] माझ्यामागे ये.”
परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला; कारण तो फार श्रीमंत होता.
तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला, “देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे बघा!”
तेव्हा शिष्य त्याच्या बोलण्याने थक्क झाले; येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मुलांनो, [जे संपत्तीवर भरवसा ठेवतात त्यांना] देवाच्या राज्यात प्रवेश करणे कितीतरी कठीण आहे!
धनवानाला देवाच्या राज्यात जाणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.”