रोमकरांस पत्र 4:1-25 - Compare All Versions
रोमकरांस पत्र 4:1-25 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याला दैहिक दृष्ट्या काय मिळाले असे आपण म्हणावे? कारण अब्राहाम कर्मांनी नीतिमान ठरला असता तर त्यास अभिमान मिरवण्यास कारण होते; पण देवापुढे नाही. कारण शास्त्रलेख काय म्हणतो? अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व म्हणून गणले गेले. आता जो कोणी काम करतो त्याचे वेतन कृपा म्हणून गणले जात नाही, पण देणे म्हणून गणले जाते. पण जो काही करीत नाही, पण जो धर्माचरण न करणार्यास नीतिमान ठरवतो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व म्हणून गणला जातो, देव ज्याच्या बाजूकडे कर्मांशिवाय नीतिमत्त्व गणतो अशा मनुष्याचा आशीर्वाद दावीद देखील वर्णन करतो; तो असे म्हणतो की, ‘ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्यांची पापे झाकली गेली आहेत ते धन्य होत. ज्याच्या हिशोबी परमेश्वर पाप गणीत नाही तो मनुष्य धन्य होय.’ मग हा आशीर्वाद सुंता झालेल्यांकरता आहे की, सुंता न झालेल्यांकरताही आहे? कारण आपण असे मानतो की, विश्वास हा अब्राहामाकडे नीतिमत्त्व असा गणण्यात आला होता. मग तो कसा गणला गेला? त्याची सुंता झाल्यानंतर किंवा सुंता होण्याअगोदर? सुंता झाल्यानंतर नाही, पण सुंता होण्याअगोदर. आणि, तो सुंता न झालेला होता तेव्हा विश्वासाने त्यास मिळालेल्या नीतिमत्त्वाचा शिक्का म्हणून त्यास सुंता ही खूण मिळाली. म्हणजे जे कोणी विश्वास ठेवतात, ते सुंता न झालेले असले तरी त्याने त्या सर्वांचा पिता व्हावे; म्हणजे त्यांच्याही बाजूकडे नीतिमत्त्व गणले जावे. आणि जे सुंता झालेले आहेत ते केवळ सुंता झालेले आहेत एवढ्यावरून नाही, पण आपला पिता अब्राहाम हा सुंता न झालेला होता तेव्हा त्याच्यात असलेल्या त्याच्या विश्वासास अनुसरुन जे चालतात त्यांचाही त्याने पिता व्हावे. कारण तू जगाचा वारीस होशील, हे वचन अब्राहामाला किंवा त्याच्या संतानाला नियमशास्त्राच्याद्वारे नव्हते, पण विश्वासाच्या नीतिमत्त्वाच्या द्वारे होते. कारण नियमशास्त्रामुळे जे आहेत ते वारीस झाले तर विश्वास निरर्थक आणि वचन निरुपयोगी केले गेले. कारण नियमशास्त्र क्रोधाला कारण होते. पण जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघन नाही. आणि म्हणून हे वचन विश्वासाद्वारे म्हणजे कृपेने दिलेले आहे; ते ह्यासाठी की, नियमशास्त्रामुळे जे आहेत त्यांनाच ते असावे असे नाही. पण अब्राहामाच्या विश्वासामुळे जे आहेत त्यांनाही, म्हणजे सर्व संतानाला ते खात्रीने असावे. तो आपल्या सर्वांचा पिता आहे. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे.’ ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला, जो मरण पावलेल्यांना जिवंत करतो आणि अस्तित्वात नसलेल्यांना ते असल्याप्रमाणे बोलावतो त्या देवाच्या दृष्टीपुढे तो असा आहे. ‘तसे तुझे संतान होईल’ या वचनाप्रमाणे त्याने अनेक राष्ट्रांचा पिता व्हावे अशी आशा नसता, त्याने आशेने विश्वास ठेवला. आणि विश्वासात दुर्बळ नसल्यामुळे, तो सुमारे शंभर वर्षांचा असता त्याने आपल्या निर्जीव शरीराकडे व सारेच्या उदराच्या वांझपणाकडे लक्ष दिले नाही. त्याने देवाच्या वचनाविषयी अविश्वासाने संशय धरला नाही; तो विश्वासात स्थिर असल्यामुळे देवाला गौरव देत होता. आणि त्याची पूर्ण खात्री झाली की, देव आपले अभिवचन पूर्ण करण्यासही तो समर्थ आहे. आणि म्हणून ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व म्हणून गणले गेले. आता ते त्याच्या हिशोबी गणले गेले, हे केवळ त्याच्याकरता लिहिले गेले नाही. पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ज्याने मरण पावलेल्यातून उठवले त्याच्यावर आपण विश्वास ठेवला तर तो ते आपल्याही हिशोबी गणले जाणार आहे. तो प्रभू येशू आपल्या अपराधांसाठी धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो जिवंत करण्यात आला आहे.
रोमकरांस पत्र 4:1-25 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपण याबाबतीत काय म्हणावे, शारीरिक दृष्टीने आपला पूर्वज अब्राहामाला काय अनुभवयास मिळाले? अब्राहाम जर कृत्यांमुळे नीतिमान ठरला असता तर त्याला बढाई मिरविण्यास काही कारण असते; परंतु परमेश्वरासमोर नाही. शास्त्रलेख काय म्हणतो? “अब्राहामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.” आता जो परिश्रम करतो त्याची मजुरी त्याचे दान नसून त्याचा अधिकार आहे. जो व्यक्ती परिश्रम करीत नाही, परंतु जो अधर्मी लोकांना नीतिमान ठरविणार्या त्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तो व्यक्ती विश्वासाने नीतिमान ठरतो. दावीद राजा पण तेच सांगतो की कर्मावाचून परमेश्वर त्यांना नीतिमान म्हणून जाहीर करतो, त्यांच्या धन्यतेचा आनंद काय वर्णावा: “धन्य ते लोक, ज्यांच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे. धन्य ती व्यक्ती, ज्याच्या हिशोबी प्रभू कधीही पापाचा दोष लावणार नाही.” हा आशीर्वाद केवळ सुंता झालेल्यांसाठी आहे की सुंता न झालेल्यांसाठी सुद्धा आहे? आपण म्हणतो की अब्राहामाचा विश्वास त्याला नीतिमत्व असे गणण्यात आला. कोणत्या परिस्थितीत त्याला मान्यता देण्यात आली? सुंता होण्यापूर्वी किंवा नंतर? नंतर नाही, पण आधी! सुंता झालेली नसताना त्याच्या विश्वासामुळे नीतिमत्व प्राप्त होते याचा शिक्का म्हणून सुंता ही खूण होती. जे विश्वास ठेवतात पण ज्यांची सुंता झाली नाही, त्या सर्वांचा अब्राहाम हा पिता झाल्यामुळे त्यांना नीतिमत्व प्राप्त व्हावे, आणि तो सुंता झालेल्याचाही पिता आहे, पण ज्यांची केवळ सुंताच झाली नाही तर जो विश्वास आपला पिता अब्राहामामध्ये सुंता होण्यापूर्वी होता त्या विश्वासावर पाऊल ठेऊन चालतात त्यांचाही पिता आहे. अब्राहामाला व त्याच्या वंशजांना जे अभिवचन दिले होते की तो या पृथ्वीचा वारस होईल, ते नियमशास्त्राद्वारे नव्हे, तर विश्वासाने जे नीतिमत्व प्राप्त होते त्याद्वारे देण्यात आले होते कारण जे नियमावर अवलंबून आहेत ते जर वारसदार आहेत, तर विश्वासास काहीच किंमत नाही आणि अभिवचने निरर्थक आहेत. कारण नियमामुळे क्रोध भडकतो आणि जिथे नियम नाही तिथे उल्लंघनही नाही. यास्तव, अभिवचन विश्वासाच्याद्वारे कृपा म्हणून अब्राहामाच्या सर्व वंशजाला मिळते. जे केवळ नियमांच्या अधीन आहेत त्यांनाच नव्हे, तर ज्यांचा विश्वास अब्राहामाच्या विश्वासासारखा आहे त्या सर्वांना, कारण अब्राहाम आपल्या सर्वांचा पिता आहे. असे लिहिले आहे: “मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले.” परमेश्वराच्या दृष्टीने अब्राहाम आमचा पिता आहे, ज्यावर त्याने विश्वास ठेवला, जो परमेश्वर मेलेल्यांना जीवन देतो आणि ज्यागोष्टी नाही त्या गोष्टी अस्तित्वात याव्या अशी आज्ञा देतो. आशा धरण्यास काही आधार नसताना, अब्राहामाने आशेने विश्वास ठेवला व तो अनेक राष्ट्रांचा पिता झाला, आणि “तुझी संततीही होईल.” असे त्याला सांगण्यात आले होते त्याचप्रमाणे झाले. त्याचे शरीर जणू काही मृत अवस्थेत असताना—तो अंदाजे शंभर वर्षाचा होता—व साराहचे गर्भाशय मृत झालेले असताना, त्याने आपला विश्वास डळमळू दिला नाही परमेश्वराच्या अभिवचनाबद्दल अब्राहाम कधीही अविश्वासाने डळमळला नाही, परंतु विश्वासामध्ये दृढ झाला आणि त्याने परमेश्वराला गौरव दिले. अभिवचन दिल्याप्रमाणे परमेश्वर करावयास समर्थ आहे ही त्याची पूर्ण खात्री होती. त्यामुळेच, “ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.” हे शब्द “तो नीतिमान ठरविला गेला” केवळ त्यांच्यासाठीच लिहिले गेले नव्हते, परंतु आपल्यासाठीही आहे, ज्यांनी प्रभू येशूंना मरणातून उठविले त्यावर विश्वास ठेवला तर परमेश्वर आपल्यालाही नीतिमान ठरवेल. त्यांना आपल्या पापांसाठी मरणाच्या स्वाधीन करण्यात आले आणि आपल्या नीतिमत्वासाठी पुन्हा उठविले गेले.
रोमकरांस पत्र 4:1-25 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याला देहदृष्ट्या काय मिळाले म्हणून म्हणावे? कारण अब्राहाम कर्मांनी नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे; तरी देवासमोर नाही. कारण शास्त्र काय सांगते? “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले.” आता जो काम करतो त्याची मजुरी मेहेरबानी नव्हे तर ऋण अशी गणली जाते. पण जो काम करत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवणार्यावर विश्वास ठेवतो त्याचा विश्वास नीतिमत्त्व असा गणण्यात येतो. ह्याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मावाचून नीतिमत्त्व गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदही करतो, ते असे : “ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे ते धन्य. ज्या माणसाच्या हिशेबी प्रभू पाप लावत नाही, तो धन्य.’ तर हे आशीर्वचन सुंता झालेल्यांना आहे किंवा सुंता न झालेल्यांनाही आहे? कारण ‘विश्वास हा अब्राहामाकडे नीतिमत्त्व असा गणण्यात आला होता,’ असे आपण म्हणतो. तो कसा गणण्यात आला? तो सुंता झालेला असताना किंवा सुंता न झालेला असताना? सुंता झालेला असताना नव्हे, तर सुंता न झालेला असताना, आणि तो ‘सुंता न झालेला असताना’ त्याच्या ठायी असलेल्या विश्वासामुळे जे नीतिमत्त्व प्राप्त होते, त्याचा शिक्का म्हणून ‘सुंता ही खूण’ त्याला मिळाली; ह्यासाठी की, जे लोक सुंता न झालेले असता आपल्याकडे नीतिमत्त्व गणले जावे म्हणून विश्वास ठेवतात, त्या सर्वांचा त्याने बाप व्हावे. आणि त्याने सुंता झालेल्या लोकांचाही बाप व्हावे, पण केवळ ते सुंता झालेले आहेत म्हणून नव्हे तर आपला पिता अब्राहाम सुंता न झालेला असता त्याचा जो विश्वास होता, त्यालाही अनुसरून चालतात म्हणून त्यांचा बाप व्हावे. कारण तू जगाचा वारस होशील, हे अभिवचन अब्राहामाला किंवा त्याच्या संततीला नियमशास्त्राच्या द्वारे नव्हते, तर विश्वासामुळे प्राप्त होणार्या नीतिमत्त्वाच्या द्वारे होते. कारण जे नियमशास्त्राचे आहेत ते जर वारस होतात, तर विश्वास निरर्थक झाला आहे आणि अभिवचन व्यर्थ झाले आहे. कारण नियमशास्त्र क्रोधाला कारणीभूत होते; परंतु जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघनही नाही. ह्या कारणास्तव ते अभिवचन कृपेच्या योगाने असावे म्हणून ते विश्वासाने आहे; अशासाठी की, ते अवघ्या संततीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे तर आपल्या सर्वांचा पिता जो अब्राहाम त्याचा जो विश्वास होता, त्याला अनुसरून जे चालतात, त्यांनाही निश्चित व्हावे. “मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे” असे अब्राहामाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे — त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. “तशी तुझी संतती होईल,” ह्या वचनाप्रमाणे त्याने ‘बहुत राष्ट्रांचा बाप’ व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता, आपले निर्जीव झालेले शरीर (तो सुमारे शंभर वर्षांचा होता) व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली; परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचा गौरव केला; आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती. म्हणूनच “ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले.” ‘ते त्याच्याकडे गणण्यात आले,’ हे केवळ त्याच्यासाठी नव्हे, तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यांमधून उठवले त्याच्यावर विश्वास ठेवणार्या आपणांसाठीही ते लिहिलेले आहे, त्या आपणांलाही ते गणले जाणार आहे. तो प्रभू येशू तुमच्याआमच्या अपराधांमुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे.
रोमकरांस पत्र 4:1-25 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याने ऐहिक दृष्टीने काय कमावले असे म्हणावे? अब्राहाम कृत्यांनी नीतिमान ठरला असला, तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे. परंतु देवासमोर नाही. धर्मशास्त्र काय सांगते? ‘अब्राहामने देवावर विश्वास ठेवला आणि त्यामुळे त्याला नीतिमान असे गणण्यात आले’. आता जो काम करतो, त्याची मजुरी दान नव्हे तर हक्काची अशी गणली जाते. अधार्मिकाला नीतिमान ठरवणाऱ्या देवावर जो विश्वास ठेवतो पण सकृत्ये करीत नाही, त्याला त्याच्या विश्वासामुळे नीतिमान गणण्यात येते. ह्याप्रमाणे ज्या माणसाला देव कृत्यांवाचून नीतिमान गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदसुद्धा करतो, ते असे: ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले गेले आहे, ते धन्य! ज्या माणसाच्या पापांचे प्रभू मोजमाप ठेवत नाही, तो धन्य! तर मग हा आशीर्वाद सुंता झालेल्यांकरिता घोषित करण्यात आलेला आहे किंवा सुंता न झालेल्यांकरिताही आहे? आम्ही असे म्हणतो, “विश्वास हा अब्राहामसाठी नीतिमत्व असा गणण्यात आला होता”. हे कधी झाले? त्याची सुंता झालेली असताना किंवा नसताना? सुंता झालेली असताना नव्हे, तर सुंता न झालेली असताना. त्याला त्याच्या विश्वासामुळे जे नीतिमत्व प्राप्त होते, त्याचा शिक्का म्हणून सुंता ही खूण त्याला मिळाली. म्हणून, जे लोक सुंता न झालेले असता आपल्याकडे नीतिमत्व गणले जावे म्हणून विश्वास ठेवतात, त्या सर्वांचा त्याने पूर्वज व्हावे. आणि त्याने सुंता झालेल्या लोकांचाही पूर्वज व्हावे, पण केवळ ते सुंता झालेले आहेत म्हणून नव्हे तर आपला पूर्वज अब्राहाम त्याची सुंता होण्यापूर्वी त्याचा जो विश्वास होता, त्याला अनुसरून ते चालतात म्हणून त्यांचाही त्याने बाप व्हावे. तो जगाचा वारस होईल, हे अभिवचन अब्राहामला किंवा त्याच्या संततीला नियमशास्त्राद्वारे नव्हे, तर विश्वासामुळे प्राप्त झाले. नियमशास्त्राचे आहेत ते जर वारस होतात, तर विश्वास फोल ठरला आहे आणि अभिवचन व्यर्थ झाले आहे. कारण नियमशास्त्र क्रोधाला कारणीभूत होते, परंतु जेथे नियमशास्त्र नाही, तेथे उ्रंघन नाही. ह्या कारणामुळे ते अभिवचन कृपेवर आधारित असावे म्हणून ते श्रद्धेवर अवलंबून असते. अशासाठी की, ते अवघ्या संततीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे तर आपल्या सर्वांचा बाप जो अब्राहाम ह्याचा जो विश्वास होता, त्याच्या श्रद्धेत जे सहभागी होतात, त्यांनाही उपलब्ध व्हावे. ‘मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे’, असे अब्राहामविषयी धर्मशास्त्रात जे लिहिलेले आहे, त्याप्रमाणे तो देवासमक्ष आपल्या सर्वांचा बाप आहे. त्याने जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला आज्ञा करून अस्तित्वात आणतो, अशा देवावर विश्वास ठेवला. ‘आकाशातील ताऱ्यांइतकी तुझी संतती होईल’, ह्या धर्मशास्त्रवचनाप्रमाणे त्याने पुष्कळ राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही विश्वास ठेवला. आपल्या शरीराची वयोवृद्ध अवस्था (तो सुमारे शंभर वर्षांचा होता) व सारा हिच्या गर्भाशयाची अक्षमता ह्या गोष्टी लक्षात घेऊनही तो विश्वासात दुर्बल झाला नाही. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने दृढ होऊन त्याने देवाचा गौरव केला. देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयास समर्थ आहे, अशी त्याची पक्की धारणा होती. म्हणूनच ‘ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.’ ‘ते त्याच्याकडे नीतिमत्व असे गणण्यात आले’, हे विधान केवळ त्याच्यासाठी नव्हे, तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यांमधून उठविले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठीदेखील ते लिहिलेले आहे, त्या आपणासाठीसुद्धा ते नीतिमत्व म्हणून गणले जाणार आहे. तुमच्या आमच्या अपराधांसाठी येशूने मृत्यू स्वीकारावा म्हणून त्याला धरून देण्यात आले व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो मरणातून उठवला गेला.