त्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले, त्याला मोठा अधिकार देण्यात आला होता. त्याच्या तेजाने पृथ्वी उजळून निघाली. तो जोरदार वाणीने म्हणाला, “पडली! महान बाबेल पडली. ती भुतांची वस्ती व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या गलिच्छ, ओंगळ पक्ष्यांचा आश्रय अशी झाली आहे. कारण तिच्या जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रे प्याली आहेत. पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जारकर्म केले व पृथ्वीवरील व्यापारी तिच्या अमर्याद विषयभोगाने धनवान झाले.”
मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली, ती म्हणाली:
“माझ्या लोकांनो,
तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये
आणि तुमच्यावर तिच्या विपत्तींमधील
कोणतीही विपत्ती ओढवू नये
म्हणून तिच्यामधून बाहेर पडा.
कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत
पोहचली आहे आणि तिच्या अनीतीची
देवाने दखल घेतली आहे.
जसे तिने दिले, तसे तिला द्या,
तिच्या कर्माप्रमाणे तिला दुप्पट द्या.
तिने प्याल्यात जितके ओतले,
त्याच्या दुप्पट तुम्ही त्यात ओता.
ज्या परिमाणाने तिने आपला गौरव
केला व विषयभोग घेतला,
त्या परिमाणाने तिला पीडा व दुःख द्या.
कारण ती आपल्या मनात म्हणते,
‘मी राणी होऊन बसले आहे,
मी विधवा नाही.
मी दुःख पाहणारच नाही!’
ह्यामुळे तिच्या पीडा म्हणजे रोगराई,
शोक व दुष्काळ एका दिवशीच येतील
आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल.
कारण तिचा न्यायनिवाडा करणारा प्रभू
देव सामर्थ्यवान आहे.”
पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म व विलास केला, ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील, तेव्हा ते तिच्याकरता ऊर बडवून शोक करतील. तिच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचे त्यांना भय वाटते म्हणून ते दूर उभे राहतील आणि म्हणतील, ‘किती भयंकर! किती किळसवाणे! अरेरे! बाबेल ही मोठी नगरी होती! बलाढ्य नगरी होती! एका घटकेत तुला न्यायदंड झाला आहे.’
पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी रडतात व शोक करतात, कारण त्यांचा माल आता कोणी विकत घेत नाही. सोने, रूपे, मौल्यवान रत्ने, मोती, तागाचे तलम कापड, जांभळ्या रंगाचे कापड, रेशमी कापड, किरमिजी रंगाचे कापड, सर्व प्रकारची सुगंधी लाकडे, सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, सर्व प्रकारची अत्यंत मौल्यवान लाकडाची, पितळेची, लोखंडाची व संगमरवरी पाषणाची पात्रे. दालचिनी, सुगंधी उटणी, धूपद्रव्ये, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षारस, ऑलिव्ह तेल, पीठ, गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम व मानवी जीव हा त्यांचा माल कोणी घेत नाही. व्यापारी तिला म्हणतात, ‘ज्या चांगल्या गोष्टी मिळवण्याची तुला उत्कंठा लागली होती त्या नष्ट झाल्या आहेत. तुझी धनदौलत व विलासाची साधने नाहीशी झाली आहेत व ती पुढे कोणाला मिळणार नाहीत!’ तिच्या साहाय्याने धनवान झालेले व्यापारी रडत व शोक करीत, तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहतील. आणि म्हणतील, ‘अरेरे, ह्या महान नगरीची दशा किती भयंकर व किती किळसवाणी झाली आहे! तागाची तलमवस्त्रे, जांभळी व किरमिजी वस्त्रे पांघरलेली सोने, मौल्यवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली नगरी!’ एका घटकेत ह्या इतक्या संपत्तीची राख झाली.
सर्व तांडेल, गलबतावरून बंदरोबंदरी जाणारे सर्व जण, खलाशी व समुद्रावर जितके उद्योगधंदा करणारे होते तितके दूर उभे राहिले