ह्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून खाली उतरतांना पाहिले. त्यास मोठा अधिकार होता; आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. तो जोरदार आवाजात ओरडून म्हणाला,
“पडली, ती महान बाबेल पडली आहे!”
ती भूतांना वस्ती झाली आहे,
सर्व अशुद्ध आत्म्यांना आणि सर्व अशुद्ध आणि तिरस्करणीय पक्ष्यांना आसरा झाली आहे.
कारण तिच्या व्यभिचाराचे मद्य जे वेड लावणारे आहे ते सर्व राष्ट्रे प्याली आहेत आणि
पृथ्वीच्या राजांनी तिच्याबरोबर व्यभिचार केला आहे;
तिच्या शक्तीशाली संपत्तीने व ऐषोआरामाने पृथ्वीचे व्यापारी श्रीमंत झाले आहेत.
मग मी स्वर्गातून आणखी एक वाणी ऐकली;
ती म्हणाली, अहो माझ्या लोकांनो, तिच्यामधून बाहेर या.
म्हणजे तुम्ही तिच्या पापात भागीदार होऊ नये
आणि यासाठी की, तिच्या कोणत्याही पीडा तुमच्यावर येऊ नयेत.
कारण तिची पापे आकाशापर्यंत पोहोचलीत
आणि तिच्या वाईट कृतीची देवाने आठवण केली.
तिने तुम्हास दिले तसे तिला परत द्या;
तिने जे काही केले आहे त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी करा; आणि
तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही त्यामध्ये तिच्यासाठी ओता.
तिने स्वतःला जेवढे गौरव व ऐषोआराम दिला,
तितक्या प्रमाणात तिला छळ आणि दुःख द्या;
कारण ती स्वतःच्या मनात म्हणते,
मी राणी होऊन बसले आहे,
मी विधवा नाही,
मी दुःख बघणार नाही.
या कारणांमुळे, तिच्यावर एकाच दिवसात पीडा येतील,
मरी, शोक आणि दुष्काळ.
ती अग्नीने पुरी जळून जाईल;
कारण तिचा न्याय करणारा, परमेश्वर देव सामर्थ्यशाली आहे.
“आणि ज्यांनी तिच्याबरोबर जारकर्म केले,” जे तिच्याबरोबर विलासात राहिले, ते पृथ्वीचे राजे तिच्या जळण्याचा धूर पाहतील, तेव्हा तिच्याकरता रडतील आणि ऊर बडवतील. ते तिच्या पीडांच्या भयामुळे दूर उभे राहून म्हणतील,
हाय! ही मोठी नगरी,
ही पराक्रमी नगरी बाबेल;
कारण एका घटकेत तुझा न्याय करण्यात आला आहे!
आणि पृथ्वीचे व्यापारी तिच्याकरता रडतील आणि शोक करतील; कारण आता त्यांचा माल कोणीही विकत घेणार नाही. सोन्याचा, रुप्याचा, हिऱ्यांचा आणि मोत्यांचा माल, तसेच तलम तागाचे कापड, जांभळे कापड, रेशमी कापड आणि किरमिजी कापड आणि सर्व प्रकारची सुवासिक लाकडे आणि सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, तशीच सर्व प्रकारची फार किमती लाकडी, पितळी, लोखंडी व संगमरवरी पात्रे; दालचिनी व उटण्याचे मसाले, धूप, सुवासिक तेल व ऊद, द्राक्षरस, तेल, सपीठ आणि गहू आणि जनावरे, मेंढरे, घोडे व रथ आणि दास व मनुष्यांचे जीव, हा त्यांचा माल कोणी विकत घेत नाही.
आणि ज्या फळांची तुझ्या जीवाला वासना होती ती तुझ्यापुढून गेली आहेत;
सर्व स्वादिष्ट आणि विलासाचे पदार्थ तुझ्यापासून नाहीसे झाले आहेत;
ते यापुढे कोणाला पुन्हा मिळणारच नाहीत.
आणि तिच्यामुळे सधन झालेले त्यांचे व्यापारी हे तिच्या पीडेच्या भयामुळे दूरवर उभे राहून रडतील, शोक करतील आणि म्हणतील,
हाय! ही मोठी नगरी!
ही जांभळी आणि किरमिजी पोशाख नेसून सोन्याचा
आणि हिऱ्यामोत्यांचा साज घालीत असे.
एवढ्या प्रचंड संपत्तीची एका तासात नासाडी झाली आहे.
आणि सगळे तांडेल, गलबतावरचे सगळे लोक आणि खलाशी आणि जितके समुद्रावर पोट भरणारे होते ते सर्व लोक दूरवर उभे राहिले