YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 16:8-21

प्रकटी 16:8-21 MARVBSI

चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली; आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपवून टाकण्याची मुभा देण्यात आली. माणसे कडक उन्हाने करपून गेली; तेव्हा त्या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि देवाचा गौरव करण्यासाठी त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही. पाचव्याने आपली वाटी श्वापदाच्या आसनावर ओतली, तेव्हा त्याचे राज्य ‘अंधकारमय झाले,’ आणि लोकांनी वेदनांमुळे आपल्या जिभा चावल्या; आणि आपल्या वेदनांमुळे व आपल्या फोडांमुळे त्यांनी ‘स्वर्गाच्या’ देवाची निंदा केली, आणि आपल्या कृत्यांबद्दल पश्‍चात्ताप केला नाही. सहाव्याने आपली वाटी ‘फरात महानदावर’ ओतली तेव्हा ‘सूर्याच्या उगवतीपासून’ येणार्‍या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्याचे ‘पाणी आटून गेले.’ नंतर ‘बेडकासारखे’ असलेले तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, श्वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्याच्या तोंडातून निघताना मी पाहिले. ते चिन्हे दाखवणारे भुतांचे आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांना एकत्र करण्यास त्यांच्याकडे बाहेर जातात. (“पाहा, जसा चोर येतो, तसाच मी येईन. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य!”) त्यांनी त्यांना इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले. सातव्याने आपली वाटी अंतराळात ओतली; तेव्हा मोठी ‘वाणी [स्वर्गाच्या] मंदिरातून,’ राजासनापासून निघाली; ती म्हणाली, “झाले!” तेव्हा ‘विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट’ झाले. शिवाय इतका मोठा भूमिकंप झाला की ‘पृथ्वीवर’ मानव ‘झाल्यापासून’ इतका मोठा भूमिकंप ‘कधी झाला नव्हता.’ मोठ्या नगरीचे तीन विभाग झाले; राष्ट्रांची नगरे कोसळली. तेव्हा देवाने आपला ‘तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला मोठ्या बाबेल नगरीला’ द्यावा, म्हणून त्याच्यासमोर तिचे स्मरण करण्यात आले. प्रत्येक बेट पळून गेले आणि डोंगरांचा ठावठिकाणाही राहिला नाही. सुमारे एक मण वजनाच्या ‘मोठ्या गारा’ आकाशातून माणसांवर पडल्या; तेव्हा गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली; कारण त्या गारांची पीडा ‘अतिभयंकर’ होती.