आणखी, तो त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो की, येथे उभे असणार्यांपैकी काही जण असे आहेत की, देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
मग सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकीकडे नेले व तेथे त्यांच्यादेखत त्याचे रूपान्तर झाले.
आणि त्याची वस्त्रे चकचकीत व इतकी पांढरीशुभ्र झाली की तितकी पांढरीशुभ्र करणे पृथ्वीवरील कोणाही परिटाला शक्य नाही.
तेव्हा मोशेसह एलीया त्यांच्या दृष्टीस पडला; ते येशूबरोबर संभाषण करत होते.
तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, “गुरूजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे; तर आम्ही तीन मंडप बनवू, आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.”
काय बोलावे हे त्याला सुचले नाही; कारण ते भयभीत झाले होते.
तेव्हा एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका.”’
मग त्यांनी अकस्मात सभोवती पाहिले तेव्हा येशूशिवाय त्यांना आपल्याजवळ आणखी कोणी दिसले नाही.
नंतर ते डोंगरावरून उतरत असता त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली की, ‘तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही कळवू नका.’
हे बोलणे मनात ठेवून मृतांमधून पुन्हा उठणे म्हणजे काय ह्याविषयी ते एकमेकांना विचारू लागले.
मग त्यांनी त्याला विचारले, “पहिल्याने एलीया आला पाहिजे, असे शास्त्री म्हणतात ते कसे?”
त्याने त्यांना उत्तर दिले, “एलीया पहिल्याने येऊन सर्वकाही यथास्थित करतो हे खरे आहे; तर मग मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी व तुच्छ मानले जावे असे त्याच्याविषयी लिहिले आहे त्याचा अर्थ काय?
तथापि मी तुम्हांला सांगतो, एलीया तर आलाच आहे आणि त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणे त्यांना वाटले तसे त्यांनी त्याचे केले.”
नंतर ते शिष्यांजवळ आले तेव्हा त्यांच्याभोवती लोकसमुदाय आहे व त्यांच्याबरोबर शास्त्री वादविवाद करत आहेत असे त्यांना दिसून आले.
त्याला पाहताच सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे धावत जाऊन त्यांनी त्याला प्रणाम केला.
त्याने त्यांना विचारले, “ह्यांच्याशी तुमचा कसला वादविवाद चालला आहे?”
तेव्हा समुदायातील एकाने उत्तर दिले, “गुरूजी, मी माझ्या मुलाला आपल्याकडे घेऊन आलो. ह्याला मुका आत्मा लागला आहे.
तो जेथे जेथे ह्याला धरतो तेथे तेथे तो त्याला खाली आपटतो, मग हा तोंडाला फेस आणून कडकडा दात खातो व निपचित पडतो. त्याला काढावे म्हणून आपल्या शिष्यांना मी सांगितले, परंतु त्यांना तो काढता येईना.”
ह्यावर तो म्हणाला, “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार? कोठवर तुम्हांला वागवून घेणार? त्याला माझ्याकडे आणा.”
त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला.
तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, “ह्याला असे होऊन किती काळ लोटला?” तो म्हणाला, “बाळपणापासून.
ह्याचा नाश करावा म्हणून त्याने ह्याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले; पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आमच्यावर दया करा व आम्हांला साहाय्य करा.”
येशू त्याला म्हणाला, “शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणार्याला सर्वकाही शक्य आहे.”
लगेचच मुलाचा बाप [डोळ्यांत आसवे आणून] मोठ्याने म्हणाला, “प्रभूजी, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका.”
तेव्हा लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे मुक्याबहिर्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, ह्याच्यातून नीघ व पुन्हा कधी ह्याच्यात शिरू नकोस.”
तेव्हा तो आत्मा ओरडून व त्याला फारच पिळून निघाला, आणि तो मेल्यासारखा झाला म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक म्हणाले.
पण येशूने त्याला हाताला धरून उठवले व तो उभा राहिला.
मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकान्तात विचारले, “आम्हांला तो का काढता आला नाही?”
तो त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचून1 दुसर्या कशानेही निघणारी नाही.”
नंतर ते तेथून निघून गालीलामधून चालले होते; आणि हे कोणास कळू नये, अशी त्याची इच्छा होती.
कारण तो आपल्या शिष्यांना शिकवत होता; तो त्यांना असे सांगत होता की, “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे; ते त्याला जिवे मारतील; आणि मारला गेल्यानंतर तिसर्या दिवशी तो पुन्हा उठेल.”
परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही व त्याला विचारण्यास ते भ्याले.