ते तेथून निघाले व लोकांनी पश्चात्ताप करावा अशी त्यांनी घोषणा केली,
पुष्कळ भुते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभ्यंग करून बरे केले.
हेरोद राजाने त्याच्याविषयी ऐकले, कारण त्याचे नाव गाजले होते. लोक म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे, म्हणून त्याच्या अंगी ही महत्कृत्ये दिसून येत आहेत.”
कोणी म्हणत, “हा एलीया आहे.” कोणी म्हणत, “हा संदेष्टा म्हणजे संदेष्ट्यांपैकीच एक आहे.”
परंतु हे ऐकून हेरोद म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तोच मेलेल्यांतून उठला आहे.”
आपला भाऊ फिलिप्प ह्याची बायको हेरोदिया हिच्यामुळे हेरोदाने स्वतः माणसे पाठवून योहानाला पकडून कैदेत जखडून ठेवले होते; कारण हेरोदाने तिच्याबरोबर लग्न केले होते,
व योहान त्याला म्हणत असे, “तू आपल्या भावाची बायको ठेवावीस हे सशास्त्र नाही.”
ह्याकरता हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करण्यास पाहत होती, परंतु तिचे काही चालेना;
कारण योहान नीतिमान व पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरी व त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई.
नंतर एक सोईचा दिवस आला. तेव्हा हेरोदाने आपल्या वाढदिवशी आपले प्रधान, सरदार व गालीलातील प्रमुख लोक ह्यांना मेजवानी दिली.
आणि हेरोदियेच्या मुलीने स्वतः आत जाऊन व नाच करून हेरोदाला व त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांना खूश केले. तेव्हा राजा त्या मुलीला म्हणाला, “तुला जे काही पाहिजे ते माझ्याजवळ माग म्हणजे मी ते तुला देईन.”
तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन.”
तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, “मी काय मागू?” ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शीर!”
तेव्हा लगेचच तिने घाईघाईने राजाकडे आत येऊन म्हटले, “माझी इच्छा अशी आहे की, बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शीर तबकात घालून आत्ताच्या आत्ता मला द्यावे.”
तेव्हा राजा फारच खिन्न झाला; तथापि वाहिलेल्या शपथांमुळे व भोजनास बसलेल्या लोकांमुळे त्याला तिला नाही म्हणावेसे वाटले नाही.
राजाने लगेच आपल्या पहार्यातील एका शिपायाला पाठवून योहानाचे शीर आणण्याची आज्ञा केली; त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला,
आणि शीर तबकात घालून आणून मुलीला दिले व मुलीने ते आपल्या आईला दिले.
हे ऐकल्यावर त्याचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे प्रेत उचलून कबरेत नेऊन ठेवले.
ह्यानंतर प्रेषित येशूजवळ जमा झाले व आपण जे जे केले व जे जे शिकवले ते सर्व त्यांनी त्याला सांगितले.
तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही रानात एकान्तात चला व थोडा विसावा घ्या;” कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जेवण्यासदेखील सवड होईना.
तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकान्तात गेले.
लोकांनी त्यांना निघताना पाहिले व पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले; आणि तेथल्या सर्व गावांतून लोक पायीच निघाले व धावत जाऊन त्यांच्याअगोदर तिकडे पोहचले.
येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला; ते तर ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला; आणि तो त्यांना बर्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.
दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे;
तेव्हा लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यांत जाऊन स्वतःकरता खायला काही विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. [कारण त्यांच्याजवळ खायला काही नाही.”]
त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते त्याला म्हणाले, “काय, आम्ही जाऊन दोनशे रुपयांच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खायला द्याव्यात?”
तो त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जाऊन पाहा.” पाहिल्यावर ते म्हणाले, “पाच, व दोन मासे.”
नंतर त्याने त्या सर्व लोकांना हिरवळीवर गटागटाने बसायला सांगितले.
तेव्हा ते शंभरशंभर व पन्नासपन्नास असे पंक्तीपंक्तीने बसले.
मग त्याने त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडल्या व त्या त्यांना वाढण्यास आपल्या शिष्यांजवळ दिल्या. ते दोन मासेही सर्वांना वाटून दिले.
मग सर्व जण जेवून तृप्त झाले.
आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या आणि माशांचेही तुकडे नेले.
भाकरी खाणारे [सुमारे] पाच हजार पुरुष होते.
नंतर, ‘मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि तुम्ही मचव्यात बसून पलीकडे बेथसैदा येथे जा,’ असे सांगून त्याने लगेचच शिष्यांना लावून दिले.
मग लोकांना निरोप देऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला.
आणि रात्र झाली तेव्हा तो मचवा समुद्राच्या मध्यभागी होता व तो (येशू) एकटाच जमिनीवर होता.
त्याला ते वल्ही मारता मारता हैराण झालेले दिसले कारण वारा तोंडचा होता. नंतर रात्री चौथ्या प्रहराच्या सुमारास तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता;
पण त्याला समुद्रावरून चालताना पाहून, हे भूत आहे असे त्यांना वाटले व ते ओरडले;
कारण त्याला पाहून ते सर्व घाबरून गेले होते. तेव्हा तो लगेच त्यांच्याबरोबर बोलू लागला व त्यांना म्हणाला, “धीर धरा; मी आहे; भिऊ नका.”
आणि तो त्यांच्याकडे मचव्यात चढून गेला; तेव्हा वारा पडला; मग ते मनातल्या मनात फारच आश्चर्यचकित झाले.
कारण भाकरींची गोष्ट त्यांना उमगली नव्हती, त्यांचे अंतःकरण कठीण झाले होते.
नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेताच्या किनार्यास पोहचले व त्यांनी मचवा बांधून ठेवला.
ते मचव्यातून उतरताच लोकांनी त्याला ओळखले.
आणि ते आसपासच्या सर्व भागांत चोहोकडे धावपळ करत फिरले व जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी आले, तेथे तेथे ते दुखणेकर्यांना बाजेवर घालून नेऊ लागले.
तो खेड्यापाड्यांत, नगरांत किंवा शेतामळ्यांत कोठेही जावो, तेथे ते दुखणेकर्यांना भर बाजारात आणून ठेवत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्याला विनंती करीत; आणि जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत.