पुन्हा तो समुद्रकिनार्यावर शिक्षण देऊ लागला, तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला; म्हणून तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला; आणि सर्व लोक समुद्रकिनारी जमिनीवर होते.
नंतर तो त्यांना दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि शिकवता शिकवता तो त्यांना म्हणाला,
“ऐका; पाहा, एक पेरणारा पेरणी करण्यास निघाला.
आणि तो पेरत असताना असे झाले की, काही बी वाटेवर पडले, ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले.
काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती; माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवले;
आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले; व मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले.
काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले व काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटवली, म्हणून त्याला काही पीक आले नाही.
काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले व त्याला पीक आले; आणि त्याचे तीसपट, साठपट, शंभरपट असे उत्पन्न आले.”
मग तो म्हणाला, “ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”
तो एकान्तात असता त्याच्याबरोबर बारा जणांसह जे होते त्यांनी त्याला दाखल्यांविषयी विचारले.
तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हांलाच दिले आहे; परंतु बाहेरच्यांना सर्वकाही दाखल्यांनी सांगण्यात येते;
ह्यासाठी की, त्यांनी पाहून घ्यावे पण त्यांना दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यांना कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये व त्यांना क्षमा मिळू नये.”
तो त्यांना म्हणाला, “हा दाखला तुम्हांला समजला नाही काय? तर मग सर्व दाखले कसे समजतील?
पेरणारा वचन पेरतो.
वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की, त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो.
तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात;
तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात.
काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून घेतात,
व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते.
चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून ते स्वीकारतात; मग कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे पीक देतात.”
आणखी तो त्यांना म्हणाला, “दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना?
कारण उघडकीस येऊ नये अशा हेतूने काहीही झाकलेले नसते आणि प्रसिद्धीस येऊ नये अशा हेतूने काहीही गुप्त राखलेले नसते.
कोणाला ऐकण्यास कान आहेत तर तो ऐको.”
पुन्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा; ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल, किंबहुना तुम्हांला जास्तही देण्यात येईल.
कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याचे असेल-नसेल तेही त्याच्यापासून काढून घेतले जाईल.”
आणखी तो म्हणाला, “परमेश्वराचे राज्य असे आहे की, जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो,
आणि ते बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही.
जमीन आपोआप पीक देते; पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा.
पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे.”
आणखी तो म्हणाला, “आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे?
ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला,
तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडपाल्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की ‘आकाशातील पाखरांना त्याच्या सावलीत वस्ती करता येते.”
असले पुष्कळ दाखले देऊन, त्यांच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे.
आणि दाखल्यांवाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे; तथापि एकान्तात तो आपल्या शिष्यांना सर्वकाही समजावून सांगत असे.
त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपण पलीकडे जाऊ या.”
तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर, तो मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते.
नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला.
तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता; तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, “गुरूजी, आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय?”
तेव्हा त्याने उठून वार्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, “उगा राहा, शांत हो.” मग वारा पडला व अगदी निवांत झाले.
नंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्ही इतके का घाबरला? तुम्हांला विश्वास कसा नाही?”
तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकांना म्हणू लागले, “हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हेदेखील ह्याचे ऐकतात.”