त्या दिवशी येशू घरातून निघून समुद्रकिनार्याशी जाऊन बसला.
तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्याजवळ जमले; म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनार्यावर उभे राहिले.
मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करण्यास निघाला.
आणि तो पेरत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले.
काही खडकाळीवर पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती, आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले;
आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले.
काही काटेरी झाडांमध्ये पडले; मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली.
काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले.
ज्याला कान आहेत तो ऐको.”
मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, “आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता?”
त्याने त्यांना उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हांला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.
कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल; परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.
ह्यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो; कारण ते पाहत असता पाहत नाहीत, आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही.
यशयाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की,
‘तुम्ही ऐकाल तर खरे,
परंतु तुम्हांला समजणारच नाही,
व पाहाल तर खरे,
परंतु तुम्हांला दिसणारच नाही;
कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे,
ते कानांनी मंद ऐकतात,
आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत;
ह्यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये,
कानांनी ऐकू नये,
अंतःकरणाने समजू नये व वळू नये,
आणि मी त्यांना बरे करू नये.’
पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत.
मी तुम्हांला खचीत सांगतो की, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्यास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही; आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्यास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही.
आता तुम्ही पेरणार्याचा दाखला ऐकून घ्या.
कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो; वाटेवर पेरलेला तो हा आहे.
खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो व ते तत्काळ आनंदाने ग्रहण करतो;
परंतु त्याला मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो, आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लगेच अडखळतो.
काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो.
चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो; तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो.”
त्याने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला : “कोणाएका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे.
लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निदण पेरून गेला.
पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदणही दिसले.
तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, ‘महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यात निदण कोठून आले?’
तो त्यांना म्हणाला, ‘हे काम कोणा वैर्याचे आहे.’ दासांनी त्याला म्हटले, ‘तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय?’
तो म्हणाला, ‘नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल.
कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेस मी कापणार्यांना सांगेन की, आधी निदण गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा; परंतु गहू माझ्या कोठारात साठवा.”’
त्याने त्यांच्यापुढे आणखी एक दाखला मांडला की, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; तो कोणाएका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला;
तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे; तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते, की ‘आकाशातील पाखरे’ येऊन ‘त्याच्या फांद्यांत वस्ती करतात.”’
त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.”
ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही;
ह्यासाठी की, संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की,
“मी आपले तोंड उघडून दाखले देईन;
जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करीन.”
नंतर तो लोकसमुदायांना निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “शेतातल्या निदणाच्या दाखल्याची आम्हांला फोड करून सांगा.”
त्याने उत्तर दिले की, “चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे;
शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत;
ते पेरणारा वैरी हा सैतान आहे; कापणी ही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत.
तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल.
मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील, आणि ते सर्व ‘अडखळवणार्यांना व अनाचार करणार्यांना’ त्याच्या राज्यातून जमा करून
त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.
तेव्हा ‘नीतिमान’ आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे ‘प्रकाशतील.’ ज्याला कान आहेत तो ऐको.