ह्या सर्व गोष्टींविषयी योहानाला त्याच्या शिष्यांनी सांगितले.
मग योहानाने आपल्या शिष्यांतील दोघांना जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारण्यास पाठवले की, “जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसर्याची वाट पाहावी?”
ती माणसे त्याच्याकडे येऊन म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्या योहानाने आम्हांला आपल्याकडे असे विचारण्यास पाठवले आहे की, जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसर्याची वाट पाहावी?”
त्याच घटकेस त्याने पुष्कळ लोकांना रोग, पीडा व वाईट आत्मे ह्यांपासून मुक्त केले होते आणि बर्याच आंधळ्यांना दृष्टी दिली होती.
मग त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानाला जाऊन सांगा, ‘आंधळे डोळस होतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.’
जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”
मग योहानाचे निरोप्ये गेल्यावर तो योहानाविषयी लोकसमुदायांना म्हणू लागला, “तुम्ही काय पाहण्यास रानात गेला होता? वार्याने हलवलेला बोरू काय?
तर मग काय पाहण्यास गेला होता? तलम वस्त्रे धारण केलेल्या माणसाला काय? पाहा, उंची पोशाख करणारे व चैन करणारे राजवाड्यात असतात.
तर तुम्ही काय पाहण्यास गेला होता? संदेष्ट्याला काय? मी तुम्हांला सांगतो, होय; संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला.
‘पाहा, मी आपला निरोप्या तुझ्यापुढे पाठवतो,
तो तुझ्यापुढे’ तुझा ‘मार्ग सिद्ध करील,’
असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो
तोच आहे.
मी तुम्हांला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत योहानापेक्षा मोठा कोणी नाही; तरी देवाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे.”
आणि जकातदारांसह सर्व लोकांनी त्याचे ऐकून देवाच्या नीतिमत्त्वाला मान्यता दिली, कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता.
परंतु परूशी व शास्त्री ह्यांनी आपणासंबंधाने असलेला देवाचा संकल्प व्यर्थ केला, कारण त्यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला नव्हता.
तेव्हा प्रभूने म्हटले, “ह्या पिढीच्या लोकांना मी कोणाची उपमा देऊ? ते कोणासारखे आहेत?
जी मुले बाजारात बसून एकमेकांना हाका मारतात त्यांच्यासारखे ते आहेत; ती म्हणतात,
‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला,
तरी तुम्ही नाचला नाहीत;
आम्ही आक्रोश केला, तरी तुम्ही रडला नाहीत.’
बाप्तिस्मा करणारा योहान भाकरी खात आला नाही की द्राक्षारस पीत आला नाही, आणि तुम्ही म्हणता, त्याला भूत लागले आहे.
मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे, आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाड व दारुडा, जकातदारांचा व पातक्यांचा मित्र!
परंतु ज्ञान आपल्या सर्व संततीच्या योगे न्यायी ठरते.”
परूश्यांतील कोणीएकाने त्याला आपल्या येथे भोजन करण्याची विनंती केली; आणि तो त्या परूश्याच्या घरी जाऊन भोजनास बसला.
तेव्हा पाहा, त्या गावात कोणीएक पापी स्त्री होती; तो परूश्याच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली;
आणि त्याच्या पायांशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली; तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले.
तेव्हा ज्या परूश्याने त्याला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, “हा संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्याने ओळखले असते.”
तेव्हा येशूने त्याला म्हटले, “शिमोन, मला तुमच्याबरोबर काही बोलायचे आहे.” तो म्हणाला, “गुरूजी, बोला.”
“एका सावकाराचे दोन कर्जदार होते; एकाला पाचशे रुपये देणे होते व एकाला पन्नास होते.
देणे फेडण्यास त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने त्या दोघांना ते सोडले. तर त्यांतून कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील?”
शिमोनाने उत्तर दिले, “ज्याला अधिक सोडले तो, असे मला वाटते.” मग तो त्याला म्हणाला, “बरोबर ठरवलेस.”