लोकसमुदायातील कोणीएकाने त्याला म्हटले, “गुरूजी, मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा.”
तो त्याला म्हणाला, “गृहस्था, मला तुमच्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले?”
आणखी त्याने त्यांना म्हटले, “सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.”
त्याने त्यांना एक दाखला सांगितला, “कोणाएका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले.
तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की, ‘मी काय करू? कारण माझे उत्पन्न साठवण्यास मला जागा नाही.’
मग त्याने म्हटले, ‘मी असे करीन; मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन; आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन.
मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.’
परंतु देवाने त्याला म्हटले, ‘अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहेस, ते कोणाचे होईल?’
जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे.”
तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, “म्हणून मी तुम्हांला सांगतो, आपण काय खावे अशी आपल्या जिवाची, अथवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराची चिंता करत बसू नका.
कारण अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे.
कावळ्यांचा विचार करा; ते पेरत नाहीत व कापणीही करत नाहीत; त्यांना कणगी नाही व कोठारही नाही; तरी देव त्यांचे पोषण करतो; पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात!
तसेच चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे?
म्हणून अति लहान गोष्टदेखील जर तुमच्याने होत नाही तर इतर गोष्टींविषयी का चिंता करत बसता?
फुले कशी वाढतात ह्याचा विचार करा; ती कष्ट करत नाहीत व कातत नाहीत; तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखाही सजला नव्हता.
जे गवत रानात आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो अल्पविश्वासी जनहो, तो तुम्हांला किती विशेषेकरून पोशाख घालील!
तसेच काय खावे किंवा काय प्यावे ह्याच्यामागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ राहू नका.
कारण जगातील राष्ट्रे ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करतात; परंतु तुम्हांला त्यांची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे;
तर तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यास झटा, म्हणजे त्याबरोबर ह्याही गोष्टी तुम्हांला मिळतील.
हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.
जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा; तसेच स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणार्या थैल्या आपणांसाठी करून ठेवा; तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही.
कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.