इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे ह्याचे त्यांना आश्चर्य वाटले; तरी “आपण काय विचारत आहात” किंवा “आपण तिच्याबरोबर का बोलत आहात” असे कोणी म्हटले नाही.
ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली,
“चला, मी केलेले सर्वकाही ज्याने मला सांगितले, तो मनुष्य पाहा; तोच ख्रिस्त असेल काय?”
तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले.
शिष्य त्याला विनंती करू लागले की, “गुरूजी, जेवा.”
परंतु तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ खायला आहे.”
ह्यावरून शिष्य एकमेकांना म्हणू लागले, “ह्याला कोणी खायला आणले असेल काय?”
येशू त्यांना म्हणाला, “ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे.
‘अजून चार महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल’ असे तुम्ही म्हणता की नाही? पाहा, मी तुम्हांला म्हणतो, आपली नजर वर करून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत.
कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकत्र करतो; ह्यासाठी की, पेरणार्याने व कापणी करणार्यानेही एकत्र आनंद करावा.
‘एक पेरतो व एक कापतो,’ अशी जी म्हण आहे ती ह्या बाबतीत खरी आहे.
ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते ते कापायला मी तुम्हांला पाठवले; दुसर्यांनी श्रम केले होते व तुम्ही त्यांच्या श्रमांचे वाटेकरी झाला आहात.”
“मी केलेले सर्वकाही त्याने मला सांगितले” अशी साक्ष देणार्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
म्हणून शोमरोनी त्याच्याकडे आल्यावर त्यांनी त्याला आपल्या येथे राहण्याची विनंती केली; मग तो तेथे दोन दिवस राहिला.
त्याच्या वचनावरून आणखी कितीतरी लोकांनी विश्वास धरला.
आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, “आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खचीत ख्रिस्त, जगाचा तारणारा आहे हे आम्हांला कळले आहे.”
मग त्या दोन दिवसांनंतर तो तेथून गालीलात निघून गेला.
कारण येशूने स्वत: साक्ष दिली की, ‘संदेष्ट्याला स्वदेशात मान मिळत नाही.’
म्हणून तो गालीलात आल्यावर गालीलकरांनी त्याचा स्वीकार केला, कारण यरुशलेमेमध्ये सणात त्याने जे काही केले होते ते सर्व त्यांनी पाहिले होते, कारण तेही सणाला गेले होते.
नंतर तो गालीलातील काना येथे पुन्हा आला; तेथे त्याने पाण्याचा द्राक्षारस केला होता. त्या स्थळी कोणीएक अंमलदार होता, त्याचा मुलगा कफर्णहूमात आजारी होता.
येशू यहूदीयातून गालीलात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली की, “आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा.” कारण तो मरणाच्या पंथास लागला होता.
त्यावर येशू त्याला म्हणाला, “तुम्ही चिन्हे व अद्भुते पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारच नाही.”
तो अंमलदार त्याला म्हणाला, “प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी खाली येण्याची कृपा करा.”
येशू त्याला म्हणाला, “जा, तुमचा मुलगा वाचला आहे.” तो मनुष्य, येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून निघून गेला.
आणि तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले, “आपला मुलगा वाचला आहे.”
ह्यावरून त्याला कोणत्या ताशी उतार पडू लागला, हे त्याने त्यांना विचारले. त्यांनी त्याला म्हटले, “काल सातव्या ताशी त्याचा ताप गेला.”
ह्यावरून ज्या ताशी येशूने त्याला सांगितले होते की, “तुमचा मुलगा वाचला आहे,” त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला.
येशूने यहूदीयातून गालीलात आल्यावर पुन्हा जे दुसरे चिन्ह केले ते हे.