सणात उपासना करण्यास आलेल्या लोकांपैकी काही हेल्लेणी होते.
त्यांनी गालीलातील बेथसैदाकर फिलिप्प ह्याच्याजवळ येऊन विनंती केली की, “महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे.”
फिलिप्पाने येऊन अंद्रियाला सांगितले; आणि अंद्रिया व फिलिप्प ह्यांनी येऊन येशूला सांगितले.
येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचा गौरव होण्याची वेळ आली आहे.
मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो.
जो आपल्या जिवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल, आणि जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील.
जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल; जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील.
आता माझा जीव व्याकूळ झाला आहे; मी काय बोलू? हे बापा, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर; परंतु मी ह्यासाठीच ह्या घटकेत आलो आहे.
हे बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर.” तेव्हा अशी आकाशवाणी झाली की, “मी ते गौरवले आहे आणि पुन्हाही गौरवीन.”
तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, “मेघगर्जना झाली.” दुसरे म्हणाले, “त्याच्याबरोबर देवदूत बोलला.”
येशूने उत्तर दिले, “ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली.
आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल;
आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.”
आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवण्याकरता तो असे बोलला.
म्हणून लोकांनी त्याला विचारले, “ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?”
ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हांला अंधकाराने गाठू नये म्हणून तुमच्याजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला; कारण जो अंधकारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही.
तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुमच्याजवळ प्रकाश असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा.”
येशू ह्या गोष्टी बोलला आणि तेथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला.
त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असताही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही;
हे ह्यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे :
“प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी
विश्वास ठेवला आहे?
परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?”
ह्यामुळे त्यांना विश्वास ठेवता आला नाही; ह्या कारणाने यशया आणखी म्हणाला :
“त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू
नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये.
म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले
व त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे.”
यशयाने त्याचा गौरव पाहिला म्हणून तो असे म्हणाला आणि त्याच्याविषयी बोलला.
असे असूनही अधिकार्यांतून देखील पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपण सभाबहिष्कृत होऊ नये म्हणून परूश्यांमुळे ते तसे कबूल करत नव्हते;
कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटला.
तेव्हा येशू मोठ्याने म्हणाला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवत नाही तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर ठेवतो.
आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्याला पाहतो.
जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे.
आणि जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळत नाही त्याचा न्याय मी करत नाही; कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे.
जो माझा अव्हेर करतो व माझ्या वचनांचा स्वीकार करत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे; जे वचन मी सांगितले, तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील.
कारण मी आपल्या मनचे बोललो नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे ह्यांविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे.
त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे हे मला ठाऊक आहे; म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”