मग पौल व त्याच्या सोबतीचे लोक पफेहून तारवातून पंफुल्यातील पिर्गा येथे गेले, आणि योहान त्यांना सोडून यरुशलेमेस परत गेला.
नंतर ते पिर्गा येथून निघून फिरत फिरत पिसिदियातील अंत्युखियास पोहचले; आणि शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन बसले.
तेव्हा नियमशास्त्राचे व संदेष्ट्यांच्या ग्रंथांचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकार्यांनी त्यांना सांगून पाठवले की, “बंधुजनहो, तुमच्याजवळ लोकांकरता काही बोधवचन असेल तर सांगा.”
तेव्हा पौल उभा राहून हाताने खुणावून म्हणाला : “अहो इस्राएल लोकांनो, व देवाचे भय बाळगणार्यांनो, ऐका.
ह्या इस्राएल लोकांच्या देवाने आमच्या पूर्वजांना निवडून घेतले, ते लोक मिसर देशात उपरे असताना त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी भुजाने त्यांना तेथून काढले.
पुढे सुमारे चाळीस वर्षेपर्यंत ते रानात असता त्याने त्यांचे गैरवर्तन सहन केले.
नंतर त्याने कनान देशातील सात राष्ट्रांचा विध्वंस करून तेथील भूमी त्यांना सुमारे साडेचारशे वर्षेपर्यंत वतन अशी दिली.
त्यानंतर त्याने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत त्यांना न्यायाधीश नेमून दिले.
मग त्यांनी राजा मागितला; तेव्हा देवाने बन्यामिन वंशातील कीशाचा पुत्र शौल हा चाळीस वर्षेपर्यंत त्यांना दिला.
नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की, ‘इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल.’
ह्या मनुष्याच्या वंशजांतून देवाने त्याच्या वचनाप्रमाणे इस्राएलासाठी येशू हा तारणारा उदयास आणला.
तो प्रकट होण्यापूर्वी योहानाने पुढे येऊन पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी सर्व इस्राएल लोकांमध्ये घोषणा केली होती.
योहान आपले कार्य पूर्ण करत असता म्हणाला, ‘मी कोण आहे म्हणून तुम्हांला वाटते? मी तो नव्हे, तर पाहा, ज्याच्या पायांतील वहाणा सोडण्यास मी योग्य नाही असा कोणी माझ्यामागून येत आहे.’
अहो बंधुजनहो, अब्राहामाच्या वंशातील पुत्रांनो, व तुमच्यापैकी देवाचे भय बाळगणार्यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे.
कारण यरुशलेमवासीयांनी व त्यांच्या अधिकार्यांनी त्याला न ओळखता आणि दर शब्बाथ दिवशी वाचून दाखवण्यात येणारे संदेष्ट्यांचे शब्दही न समजता, त्याला दोषी ठरवून ते शब्द पूर्ण केले.
आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा अशी त्यांनी पिलातास विनंती केली.
मग त्याच्याविषयी लिहिलेले सर्वकाही पूर्ण करून त्यांनी त्याला खांबावरून खाली काढून कबरेमध्ये ठेवले.
पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले.
त्याच्याबरोबर जे गालीलाहून यरुशलेमेत आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे; ते आता लोकांना त्याचे साक्षी आहेत.
आपल्या पूर्वजांना जे वचन देण्यात आले होते त्याची सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगतो.
देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन तुमच्याआमच्या मुलाबाळांकरता पूर्ण केले आहे; स्तोत्र दुसरे ह्यातही असे लिहिले आहे की,
‘तू माझा पुत्र आहेस;
आज मी तुला जन्म दिला आहे.’
शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून त्याने त्याला मेलेल्यांतून उठवले; ह्याविषयी त्याने असे म्हटले आहे की,
‘दाविदाला दिलेले जे पवित्र व विश्वसनीय दान
ते तुम्हांला’ देईन.
म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतो,
‘तू आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा
अनुभव येऊ देणार नाहीस.’
कारण दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला, आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याला कुजण्याचा अनुभव आला;
परंतु ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही.
म्हणून बंधुजनहो, तुम्हांला हे ठाऊक असो की, ह्याच्या द्वारे तुम्हांला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे;
आणि ज्याविषयी मोशेच्या नियमशास्त्राने तुम्ही नीतिमान ठरत नाही त्या सर्वांविषयी ह्याच्याकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो.
म्हणून सावध राहा, नाहीतर संदेष्ट्याच्या ग्रंथात जे सांगितलेले आहे ते तुमच्यावर येईल :
‘अहो धिक्कार करणार्यांनो, पाहा,
आश्चर्य करा व नाहीसे व्हा;
कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो,
ते कार्य असे की, त्याविषयी तुम्हांला कोणी
सविस्तर सांगितले तरी तुम्ही विश्वास
ठेवणारच नाही.”’
ते बाहेर जात असता लोकांनी विनंती केली की, आम्हांला पुढल्या शब्बाथ दिवशी ह्या गोष्टी सांगाव्यात.
आणि सभा उठल्यावर, यहूद्यांतील व भक्तिमान यहूदीयमतानुसारी ह्यांच्यातील पुष्कळ जण पौल व बर्णबा ह्यांच्यामागे गेले; त्या दोघांनी त्यांच्याबरोबर बोलून देवाच्या कृपेत टिकून राहण्यास त्यांचे मन वळवले.
पुढल्या शब्बाथ दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकायला जमले.
पण लोकसमुदायांना पाहून यहूदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले.
तेव्हा पौल व बर्णबा हे निर्भीडपणे म्हणाले, “देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगण्याचे अगत्य होते; तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता व आपणांला सार्वकालिक जीवनाकरता अयोग्य ठरवता त्या अर्थी पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो.
कारण प्रभूने आम्हांला आज्ञा दिली आहे की,
‘मी तुला परराष्ट्रीयांसाठी प्रकाश करून ठेवले आहे,
ह्यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस.”’
हे ऐकून परराष्ट्रीय आनंदित झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णन केला; तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास ठेवला.
आणि प्रभूचे वचन त्या सर्व प्रांतात पसरत गेले.
तेव्हा यहूदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील मुख्य पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालवून दिले.
त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्यांच्यावर झटकून इकुन्यास गेले.
इकडे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.